गोंदिया,दि.26 ;
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस गोंदिया जिल्हात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. सध्या सर्वत्र धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय..?
हवामान खात्याकडून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला असून आता मान्सून गुजरातमधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
0 टिप्पण्या